७ सप्टेंबर, २०१३

सत्य



जेव्हा इथे दिव्यांच्या गेल्या विझून वाती;
आली अखेर माझ्या हातात फक्त माती.

श्वासात शाश्वतीचा चमके न काजवाही;
अंधार भोगणारी गर्विष्ठ मात्र छाती.

सोडून धर्मशाळा ही पाखरे प्रवासी;
अज्ञात त्या दिशेने कोठे उडून जाती?

आयुष्य-द्वारका ही जाता अशी तळाला;
तुळशीस कृष्ण आता लागेल काय हाती.

पिंडास टाळणार्‍या सर्वज्ञ कावळ्यांनी;
गुंतून ठेवलेली प्राणात सर्व नाती.

नीतीस वाव नाही,धर्मास भाव नाही;
मृत्यूस काय त्याचे जाती तशा जमाती.

रे दु:ख माणसाचे अंतिम सत्य आहे;
बाकी मवाळ सा‍र्‍या आहेत जाहिराती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा